केतन ने "जे जे उत्तम.." साठी खो दिलेला तेव्हा हा आठवला..प्रभाकर पेंढारकरांच्या रारंगढांग मधला मला आवडलेला उतारा..मागे वही्त लिहून घेतलेला.आता ब्लॉग मधे लिहायला मजा वाटली..
----
पावसाच्या थेंबाचा हा आवाज सोडला तर रात्रीच्या वेळी सारंच शांत आहे.हिमशिखरावर रेंगाळणारे ढग आता खाली उतरले आहेत.त्यात दूरवरचा किन्नोर कैलास,बलदंड देहाचा रारंग ढांग आणि त्याला विळखा घालून वाहणारी सतलज,सगळंच दिसेनासं झांल आहे.टेबलावरचा कंदील,समोरचे कागद आणि हातातलं पेन एवढ्याच गोष्टींच अस्तित्व उरल्यासारखं वाटत आहे.
हा खराखुरा एकांतवास.पण एकांतवासातही माणूस एकटा थोडाच असतो?माझ्या नाही का तुमच्याशी गप्पा चाललेल्या?
तुम्ही विचारलतं,हिमालय कसा दिसतो?केवढा अवघड प्रश्न!हिमालयाचं मला झालेलं पहिलं दर्शन केवळ अविस्मरणीय.सिमल्याहून पुढं,नारकंड्याला हिमालयाची शुभ्रधवल हिमशिखरं एकदम दिसू लागली.एकाच्या पाठोपाठ दुसरं ,तिसरं..नजर पाहू शकेल एवढी शिखरं!
पण तुम्हाला असा दुरून पोस्टकार्डावरच्या रंगीत चित्रासारखा हिमालय नको आहे.मला हे पटतं!तुम्हाला तुमच्या खोलीतून सागर दिसतो तसा मला इथं हिमालय दिसतो.उगात्या सूर्याचे किरण किन्नोर कैलासच्या शुभ्र शिखरावर पडले की तो सुवर्णाचा होऊन जातो.कधी कधी, संध्याकाळी खालच्या दरीतून ढग वर येतात आणि त्यांतून फक्त शिखरच दिसत राहतं. निळ्या आकाशातून पंख पसरुन निघालेल्या पांढ-याशुभ्र पक्षासारखं!
हिमालयाबद्द्ल लिहीतो आहे खरा.पण प्रतिक्षणी लक्षात येत आहे की त्या किन्नोर कैलासचं,रारंग ढांगाचं आणि सतलज नदीचं वर्णन करता येणं केवळ अशक्य आहे. त्यांचे फोटो घेऊन पाठवले तरी त्यांची कल्पना येणं शक्य नाही.कारण निसर्गचित्र म्हणजे निसर्गदृश्य नव्हे.तो निसर्गाशी संवाद व्हावयासं हवा.हा संवाद एकदा साधला की निसर्ग आपणहून तुमच्याशी बोलू लागतो.त्याची भाषा केवढी वेगळी.त्याचे शब्द किती विविध!
त्या सतलजच्या प्रवाहाचा सतत चाललेला ध्रोंकार..रारंग ढांगातले दगड त्या ओघात पडल्यावर उसळणा-या पाण्याचा आवाज..पहाटेच्या वेळी पक्षांची किलबिल,रात्री रातकिड्यांची किरकीर..मेघांचा गडगडाट..क्षणात चमकून जाणा-या विजेचा कडकडाट..कधी वा-याची भणभण..कधी नुसतीच पानांची सळसळ..आणि ह्या सर्वांपेक्षा अगदी वेगळाच एक आवाज.इथं येण्यापूर्वी कधी न ऐकलेला.हा आवाज शांततेचा!
